Wednesday, November 10, 2010

II श्री विश्वकर्मा कथा माहात्म्य II

II श्री विश्वकर्मा कथा माहात्म्य II
प्रथम अध्याय..
कोणे एके काळी समस्त ऋषीगण धर्मक्षेत्र रूपी कुरूक्षेत्रात एकत्र येऊन पुराणाचे मर्म जाणणार्‍या धर्मज्ञ सुतजींना विचारते झाले. II१II
हे पुराण प्रविण! आम्हांस अचानक एक संदेह निर्माण झाला आहे. आपण त्यास जाणून निरसन करावे. II२II
अतुल तेजस्वी भगवान श्री विष्णुंच्या अनेक रुपांचं वर्णन आम्ही ऐकून आहोत, परंतू हे जाणत नाही की त्यातील सर्वश्रेष्ठ कोण आहे? कृपा करून आपण रहस्यभेद करावे. II३II
श्री सुतजी वदले - हे मुनीगणो! विश्वहितासाठी सर्वोत्तम असा प्रश्न आपण केला आहात. म्हणून मी संतुष्ट झालो. II४II
हे तपोधनो! जगत्पुज्य, जगतपति भगवान श्री विष्णुंची अनेक रूपे आहेत. त्यातील सर्वश्रेष्ठ रूपास आपण आदरपुर्वक ऐकावे. II५II
ज्यांच्या फक्त स्मरणाने भले भले पापीजनदेखील पापमुक्त झाले यात कसलीही शंका नाही. II६II
हाच प्रश्न एकदा क्षीरसागरात श्री लक्ष्मीने भगवान श्री विष्णुंना केला होता. II७II
श्री लक्ष्मी वदल्या - हे जगन्नाथ! भक्तजन आपल्या अनेक रूपांची भक्तीभावाने पृथ्वीतलावर पुजा करतात. II८II
हे स्वामी! ती सगळी रूपे समानच आहेत की मुख्य आणि गौण विचारांत फरकही आहे. II९II
भगवान श्री विष्णु लक्ष्मीस म्हणाले - हे प्रिये! जेव्हा मी योगमायासह समस्त ब्रम्हांडास आपल्या आत्म्यात विलीन करतो. मी अनेक रूपे धारण करावी अशा प्रकारची इच्छा बाळगलेल्या जीवांच्या कर्मभोगासाठी क्षणभरात असंख्य लोकांत ज्या रूपाने रचना करतो. त्या रूपास म्हणतो. तू ध्यानपूर्वक ऐक. II१०II
हे देवी! चारी दिशांनी प्रकाशित करतो किंवा त्यानंतर नर-सृष्टी करण्याची इच्छा बाळगणारे प्रथम तपस्वी श्री ब्रम्हांस रचतो. II११II
त्या ब्रम्हास स्तुति, यज्ञ, गान चे प्रकाशक ऋग, यजु: आणि सामवेदाचे उपदेश करतो. II१२II
अशाप्रकारे शिल्प विद्याचे प्रतिपादक अथर्ववेदासाठी अर्पण करत आहे. ह्याच वेदाद्वारे शिल्पकारांनी अनेक वस्तुंची रचना केलेली आहे. II१३II
हे महेश्वरी! सकल रूपात हेच मुख्य रूप आहे. ज्याने सारी सृष्टी क्षणात निर्माण केली. II१४II
जो मनुष्य ह्या अद्भुत रूपाचं चिंतन करतो, त्याची सर्व विघ्ने नाश पावतात. II१५II
जो शिल्पकार भगवान श्री विश्वकर्माजींचं स्मरण करतो. त्याची सकल दु:खे दूर होतात. II१६II
II इति श्री विश्वकर्मा माहात्म्य प्रथम अध्याय समाप्त.. II

***

द्वितीय अध्याय...
सुत उवाचसुतजी वदले - अशाप्रकारे तिन्ही लोकाचे स्वामी भगवान श्री विष्णु लक्ष्मीस आपल्या रूपांचं वर्णन करून निशब्द झाले. II१II
ऋषी विचारते झाले - सकल धर्माचे जाणकार, वक्तृत्वश्रेष्ठ हे महात्मा सुतजी! या अद्भुत रहस्यास आपण कसे जाणता? विश्वात हे रूप कसे पुज्य आणि प्रसारित झाले? II२II
महर्षींच्या उत्तरादाखल सुतजी वदले - हे मुनीगण! ज्याप्रकारे विश्वाचं कल्याणकारक समाचार मी ऐकले ते आपन आता ऐकावे. II३II
महर्षी अंगिरा नामक एक ऋषी होते. ते हिमालय पर्वतालगत असणार्‍या गंगातीरी तप करत असत. II४II
पावसात आपल्या पर्णकुटीबाहेर बसून, हिवाळ्यात थंड पाण्यात आणि उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हात बसून तपश्चर्या करित असत. परंतू तरीही त्यांच्या मनास समाधान लाभलं नाही. त्यांचं मन तहानलेल्या मृगाप्रमाणे धावू लागले. II५II
त्याचवेळी अचानक आकाशवाणी झाली की, हे तपोधन! तू ध्येयापासून विरक्त फुकट कष्ट करतो आहेस. II६II
जसं वेध चुकलेला तीर योग्य लक्ष्य साधत नाही. तीच गत तुझी झाली आहे आणि म्हणून लोकांत तुझं हसं होतयं. II७II
उत्पत्ती आणि संहारक, विश्वविख्यात, अभिष्ट फलदाता, महातेजस्वी, पंचमुखी, दशहस्तधारी, सरस्वती तथा महाराणी लक्ष्मी पुजीत भगवान श्री विश्वकर्माजींची तू पुजा कर. आराधना कर. चिंतन कर. II८II
या रूपास प्रत्यक्ष श्री विष्णुंनी क्षीरसागरात मला कथन केला होता, ज्याने आजही माझं सर्वांग रोमांचित होतं. II९II
अमावस्या तिथीस सर्व कार्ये सोडून विधीपुर्वक पुजा कर. II१०II
अशी आकाशवाणी ऐकून अंगिरा ऋषी विचारमग्न होत ध्यानस्थ झाले. II११II
भगवान श्री विश्वकर्माजींच्या स्मरणाने त्यांच्या मनात शिल्पशास्त्राचं भांडार अर्थासहित अथर्ववेदाचं ज्ञान झालं. II१२II
याच तत्वज्ञ मुनी अंगिरांनी आपल्या बुद्धीने विमानासारख्या वस्तूची निर्मीती केली. II१३II
भगवान श्री विश्वकर्माजींच्या कृपेनेच हे जग सुखी झाले कारण, त्यांच्याच कृपेने वाहन बनवण्याच्या ज्ञानाचा प्रसार झाला. तेव्हापासून भगवान श्री विश्वकर्माजींचं रूप विश्वात प्रसिद्ध झाले आणि परंपरेने ही कथा मला ज्ञात झाली. II१४II
हे महाज्योती रूप आहे जे विश्वहितकारी आहे. जो मनुष्य यांचं पुजन आणि मनन करत नाही तो कृतघ्न आहे. II१५II
II इति श्री विश्वकर्मा माहात्म्य द्वितीय अध्याय समाप्त.. II


***

ll तृतीय अध्याय..ll
ऋषीजन वदले - हे सुतजी! आपल्या मुखातून भगवान श्री विश्वकर्माजींचं चरित्र ऐकल्यावर आता आमची मने तृप्त होत नाहीत. ll१ll
यावेळी भगवान श्री विश्वकर्माजींचं चरित्र ऐकण्यास आम्ही अतिउत्सुक झालो आहोत. ll२ll
श्री सुतजी उत्तरले - हे मुनीजनो! जगदगुरू सच्चिदानंद भगवान श्री विश्वकर्माजींची सुमनोहर कथा आपण सावध होऊन ऐका. ll३ll
पुर्वी प्रमंगद नामक एक राजा होता. जो आपल्या प्रजेचं पुत्रासमान पालन करित होता. आळस त्यागून धर्मकार्य करित होता. ll४ll
तो प्रेमाने प्रजेस शिक्षा करी. तलवार किंवा तत्सम शस्त्रांनी त्याने कधी शिक्षा केली नाही. ll५ll
गरिबीने पीडीत मनुष्य माझं शासन स्वीकारतील ही त्याची नीती होती. तो सदैव प्रजेस सुखी करण्यात मग्न असे. ll६ll
अपात्र असणार्‍यांना दान करणे, हे दुष्टांचं रक्षण करण्यासारखं तो मानत असे. म्हणून कृतघ्न आणि दुष्ट लोकांच्या अभावामुळे त्याचं राज्य सुखी होतं. ll७ll
त्याची कमलनयनी, सतीस्वरूप, धर्म-कर्म आणि व्रतकैवल्यांत श्रद्धा असणारी कमला नावाची पत्नी होती. ll८ll
त्या प्रजापालक धर्मात्मा राजाच्या शरीरात दुर्भाग्याने खुप वेदना देणारा कुष्ठरोग जडला. ll९ll
नाना उपाय करूनही रोग दूर होइना. वैद्यांच्या मात्रा परिणाम करेनात. रोगाने ग्रस्त राजा दु:खी झाला. ll१०ll
सुतजींच्या कथनानंतर ऋषींनी प्रश्न केला - हे सुतजी! आपल्या आज्ञेने शिक्षा करणार्‍या राजास हा पापरोग कसा जडला? ll११ll
जर अशा धर्मात्मांना रोग होतो, तर मग विश्वात धर्मावर कोण विश्वास करील? ll१२ll
उत्तरादाखल सुतजी वदले - तो राजा आधी नास्तिकतेचा प्रचार करत होता. लोकांना उपदेश करायचा की, हे विश्व अनंत काळापासून आहे. याचा रचनाकार विश्वकर्मा वगैरे कुणीही नाही. तर मनुष्य उपकारांचं पुण्य फळ कसं प्राप्त करेल? ll१३ll
जर परोपकारी मनुष्यास पुण्य फळ मिळालं नाही तर तो कुणावर उपकार का करील? अशामुळे या विश्वाचा नाश होईल. या हेतूने पाखंड्यास दंड मिळायलाच हवा. ll१४ll
अनेक जन्मांच्या पाप आणि पुण्याचं फळ एका जन्मात मिळत नाही. यात शंका नाही. आता पुढील कथा कथन करतोय. सावधपणे ऐकावी. ll१५ll
राजाची खिन्नता पाहून मनातून दुखावलेली राणी वदली - हे राजन! महातेजस्वी पुरोहित उपमन्यु देखील डोळ्यांच्या आजाराने अंध झाले होते. ll१६ll
पुरोहित उपमन्युनी आपल्या ज्ञानाच्या बळावर अमावस्येच्या दिवशी व्रत करून भगवान श्री विश्वकर्माजींची पुजा करणे उचित समजले. ll१७ll
पुजेच्या दिवशी उपमन्यु पुरोहिताने एका सायंकाळी फलाहार केला आणि सर्व कार्ये सोडून भगवान श्री विश्वकर्माजींच्या पुजेस प्रारंभ केला. ll१८ll
त्याच व्रताचं फळ त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आज वृद्धावस्थापर्यंत ती जशीच्या तशी आहे. ll१९ll
हे महाराज! मी नम्रभावे प्रार्थना करित आहे की, आपणही दीनपालक भगवान श्री विश्वकर्माजींना शरण जावे. ll२०ll
राजा उद्गारला - हे प्रिये! तू योग्य म्हणालीस. हे ऐकून माझं मन प्रफुल्लित झालयं. नवा उत्साह आलाय आणि माझा विश्वास आहे की, हे कार्य भगवान श्री विश्वकर्माजींच्या कृपेने सफल होईल. ll२१ll
सुतजी पुढे म्हणाले - त्या दिवसापासून राजा दर अमावस्येला भगवान श्री विश्वकर्माजींचं पुजन करू लागला. ll२२ll
पुजेच्या कृपाप्रसादाने राजा लवकरच कुष्ठरोगातून मुक्त झाला. ll२३ll
जो व्यक्ति नेहमी प्रेमपुर्वक भगवान श्री विश्वकर्माजींचं श्रद्धा-भक्तिपुर्ण ध्यान पुजन करतो, तो सर्व रोगांतून मुक्त होऊन अंती मोक्षपद प्राप्त करतो. ll२४ll
ll इति श्री विश्वकर्मा माहात्म्य तृतीय अध्याय समाप्त..ll

***

चतुर्थ अध्याय..
पुन्हा सुतजी वदते झाले - हे मुनींनो! मी आपणास भगवान श्री विश्वकर्माजींच्या चरित्राचं कथन केलं. आता मी समस्त विश्वाला चकीत करणार्‍या चरित्राचं वर्णन करित आहे.
वाराणसीपुर नामक एका गावात धार्मिक व्यवहाराने चालणारा एक रथकार आपल्या पत्नीसह राहत होता.
आपल्या कामात तरबेज असा हा विद्वान रथकार उदरनिर्वाहासाठी वणवण भटकत असे.
अशा भटकण्यानेही त्याला अधिक मिळकत मिळत नसे.
त्याची पत्नीदेखील त्याच्यासारखीच पुत्र नसल्याकारणे सदैव चिंतीत राही. आणि आपल्या वृद्धपकाळाची काळजी करी.
तरीही नाना विविध तंत्र मंत्रादी उपाय करूनदेखील तिची मनोकामना पुर्ण होऊ शकली नाही.
काही दाढी-मिशीवाले धुर्त मोरपिसांनी भुर्जपत्रांवर मंत्र लिहून आणि स्वत:ला तांत्रिक संबोधत की माझ्यावर अमुक एक देवता प्रसन्न आहे, तुझं मनोरथ पुर्ण करतील. असं सांगून विभुति देत असत.

या धुर्तांच्या विशाल महामाया-जाळात अडकत चाललेल्या त्या दु:खित पती-प्त्नीस पाहून एक शेजारी ब्राम्हण त्यांस म्हणाला - हे रथकार! पुत्रप्राप्तीसाठी भटकत आहेस. मला वाटतं, तू मुर्खच असावास.
ह्या खोट्या उपायांनी आपल्या मनोकामनेस पूर्ण करू इच्छितोस . व्यर्थ उद्योगाने कार्य सफल होत नाही.
अशा लोकांपेक्षा अधिक मुर्ख ते आहेत, जे धर्माच्या नावाखाली विश्वात वितुंड माजवणारे पाखंडी यांच्या झाड्-फुंकाच्या अग्नि-ज्वालेने पुत्रास दिर्घायु झाल्यांचं मानतात.
पाखंड्यांच्या फुंकेने दग्ध कुमातेच्या पुत्रास धर्मशास्त्रानुसार बुद्धी प्राप्त होत नाही.
म्हणून तुम्ही या व्यर्थ उपायांचा त्याग करून केवळ परम दयाळू भगवान श्री विश्वकर्माजींना शरण जा.
हे रथकार! त्यांच्या कृपेने तुमचे कार्य अवश्य सफल होईल. भगवान श्री विश्वकर्माजींच्या कृपेशिवाय कोणत्याही कष्टातून मुक्ती नाही.
जर ही दुरावस्था तुमच्या कुकर्माचं फळ असेल तर, भगवान श्री विश्वकर्माजी त्या दु:खातून उद्धार दुसर्‍या योनीत अवश्य करतील.
ईश्वर कर्माचं फळ अर्थात सुख अथवा दु:ख देतो. त्याची साधने अनेक आहेत. दु:ख देण्यासाठी नि:संतान किंवा दरिद्री बनवणं साधन नाही.
म्हणून सर्व कार्य ठेवून अमावस्येच्या दिवशी व्रत कैवल्य करून भगवान श्री विश्वकर्माजींचं पुजन करावे, त्यांचं माहात्म्य श्रवण करावेआणि यथाशक्ति परोपकासाठी धन खर्च करावे.
महात्मा ब्राम्हणाच्या मुखातून असा उपदेश ऐकून रथकाराचे डोळे उघडले.
परोपकारी ब्राम्हणाच्या चरणी डोके ठेवून भगवान श्री विश्वकर्माजींचं चिंतन करित रथकार आपल्या घरी गेला.
त्या दिवसापासून ब्राम्हण रथकार श्री विश्वकर्माजींच्या चरणकमळांचं ध्यान करू लागला.
आणि त्याची पत्नीदेखील खोट्या उपायांना सोडून भगवान श्री विश्वकर्माजींच्या गुणांची भक्ती करू लागली.
अमावस्या तिथीस विधी-विधानाने व्रत केल्याने रथकार लवकरच धनवान आणि पुत्रवान झाला.
त्या दिवसापासून त्याचा एकही दिवस विना मिळकत जात नव्हता.
त्याचा पुत्र शुशील, गुणी, विद्वान, संध्यावंदन करणारा आणि माता-पित्याचा परमभक्त झाला.
अशाप्रकारे दोन्ही स्त्री-पुरूष गृहस्थ धर्माचं पालन करत सुखी जीवन जगू लागले.
जो मनुष्य भगवान श्री विश्वकर्माजींचं पुजन, चिंतन करतो, तो जीवनात पुत्र-कलत्र सहित सुखी राहतो.
इति श्री विश्वकर्मा माहात्म्य चतुर्थ अध्याय समाप्त..

***


पंचम अध्याय..
श्री सुतजी वदले - हे महर्षींनो! विश्वविख्यात भगवान श्री विश्वकर्माजींचं माहात्म्य आपणांस पुन:श्च कथन करत आहे. त्यास आपण ध्यानपुर्वक श्रवण करावे. ll१ll
उजैन नगरीत प्रतिष्ठीत आणि कुशाग्र बुद्धीचा एक धर्मात्मा शेठ राहत होता. ll२ll
त्याची तिजोरी कुबेराच्या भंडारासारखी हिरे-माणिकांनी सदैव भरलेली असे. ll३ll
त्याच्या आजुबाजूला असा कोणी मनुष्य नव्हता, ज्याने विवाहकार्यातील खटला लढण्यासाठी किंवा रोग-संकटातून मुक्तीसाठी त्याच्याकडून धन घेतलेले नाही. ll४ll
परोपकारात धन खर्च झाल्याने तो शेठ गरीब होवून दु:खी झाला. ll५ll
त्या शेठला पुर्ण विश्वास होता की, त्याचे परम मित्र त्याची नक्कीच मदत करतील. ll६ll
परंतू त्याच्या आशेवर पाणी फिरलं. कोणीही कृतघ्न मित्र त्याची मदत करण्यास तयार झाला नाही. ll७ll
धनहिन होताच त्याचे मित्र त्याचे शत्रु बनले आणि त्याची निंदा करू लागले. ll८ll
यापुर्वी त्याचे मित्र शेठला पाहून नजर झुकवून चालायचे. स्वार्थी मित्र संकटकाळी साथ देत नाहीत. ll९ll
अशा नीच प्रवृत्तीच्या माणसांच्या व्यवहारापासून शेठला जगाशी विरक्ती आणि घृणा निर्माण झाली. ll१०ll
तो कृतघ्नांच्या तोंडावर थुंकून आपल्या नगरीस सोडून जंगलात गेला. ll११ll
कंदमुळे, फळे खावून तो आपले जीवन व्यतीत करू लागला. जंगलात योगायोगाने कुणा मनुष्याला पाहील्यावर तो तिरस्काराने तिथून पळून जात असे. ll१२ll
एकदा फिरता फिरता शेठ एका निर्जन वनात गेला आणि तेथे त्याने पाहीले की, पर्वताच्या गुहेत पद्मासन लावून शांत चित्ताने लोमेश मुनी तपश्चर्या करित आहेत. ll१३ll
शेठ त्यांना पशू समजून त्यांच्या जवळ जावून बसला. ll१४ll
शेठला जवळ बसलेलं पाहून मुनींनी विचारलं - कुशल तर आहे? कुठून आला आहात? ll१५ll
पशूला मनुष्याची बोली बोलताना पाहून शेठला मोठे आश्चर्य वाटले पण प्रश्न विचारल्यावर त्याने अथ पासून इतिपर्यंत आपला वृत्तांत कथन केला. ll१६ll
हे ऐकून मुनीवर शेठला म्हणाले - जर तुम्हास पापी आणि कृतघ्नांची घृणा वाटते तर, मग भगवान भगवान श्री विश्वकर्माजींशी विमुख का आहात? ll१७ll
हे शेठ! सकल सुखांस भोगणार्‍या त्या ईश्वरानेच तुला निर्मीला आहे. ll१८ll
ज्याने समस्त विश्व रचून कर्मानुसार व्यवस्था केकी आहे. त्यांस त्यागून तू कसा सुखी होऊ शकशील? ll१९ll
नास्तीक आणि कृतघ्न मनुष्य प्रथम परम्यात्म्यास विसरून जातो. म्हणून अद्भुत शक्तीशाली भगवान श्री विश्वकर्माजींना शरण जा. ll२०ll
उर्ध्वमुल जगताचे कर्ता भगवान श्री विश्वकर्माजींची अनेक रूपे आहेत. ll२१ll
द्वीभुज, चतुर्भुज आणि दश्भुज किंवा एकमुखी, चतुर्मुखी आणि पंचमुखी ही रूपे आहेत. ll२२ll
मनु, मय, त्वष्ठा, शिल्पी आणि दैवज्ञ नामक त्यांचे पाच पुत्र आहेत. ll२३ll
त्यात मनुने लोखंडाचे, मयने लाकडाचे, त्वष्ठाने तांब्याचे काम केले. शिल्पीने वीट आणि दैवज्ञाने चांदीची कामे केली. भगवान श्री विश्वकर्माजींच्या पाच पुत्रांची कर्म यालाच यज्ञ-कर्म म्हणतात. ll२४ll
सेतू बांधण्यासमयी श्रीरामाने भगवान श्री विश्वकर्माजींचं पुजन केलं होतं. ll२५ll
द्वारका निर्माणाच्या वेळी श्रीकृष्णाने भगवान श्री विश्वकर्माजींची पुजा केली होती. ll२६ll
म्हणून तु देखील त्यांची पुजा कर. सर्व दु:खातून मुक्त होऊन सकल सुखाची तुला प्राप्ती होईल. ll२७ll
मुनींच्या उपदेशाने शेठला आत्मिक शांती मिळाली आणि त्या दिवसापासून तो भगवान श्री विश्वकर्माजींचा भक्त बनला आणि शेवटी देवत्व प्राप्त करून स्वर्गस्थ झाला. ll२८ll
जो मनुष्य भक्तीयुक्त मनाने भगवान श्री विश्वकर्माजींचं ध्यान करतो तो त्यांच्या चरणकमळांची भक्ती प्राप्त करतो. ll२९ll
भगवान श्री विश्वकर्माजींच्या पवित्र यशाचं जो बुद्धीमान मनुष्य श्रवण करतो तो पृथ्वीवरील समस्त सुख प्राप्त करून अंती भगवान श्री विश्वकर्माजींच्या शाश्वत पदास स्पर्श करतो. ll३०ll
ll इति श्री विश्वकर्मा माहात्म्य पंचम अध्याय समाप्त..ll

No comments:

Post a Comment